Advertisement
महायुती सरकारमधील होणारी घुसमट सदाभाऊ खोत यांनी केली व्यक्त
सांगली/विटा : शेतकरी कुटुंबातील चळवळीतील कार्यकर्ते असलेले सदाभाऊ खोत एका मिश्कील वक्तव्यामुळे चर्चेत आले आहेत. मला कुठं तरी राज्यपाल तरी करा, नाही तर आपली अवस्था बंद बॅडवाल्यासारखी होईल, बॅडवाल्याचं कसं असतं चांगलं गाणं वाजवायला लागलं की शेजारी असणारे सर्व म्हणतात की पुन्हा एकदा होऊन जाऊदे. तशी आमची अवस्था झाली आहे, अशा मिश्कील शब्दात आमदार सदाभाऊ खोत यांनी महायुती सरकारमधील होणारी घुसमट व्यक्त केली आहे.
आमदार गोपीचंद पडळकर यांचा विटा येथे नागरी सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्यामध्ये बोलताना आमदार सदाभाऊ खोत यांनी माजी आमदार पृथ्वीराज देशमुख हे खासदार आणि गोपीचंद पडळकर हे मंत्री होतील असे सांगत आपल्याला किमान राज्यपाल तरी करा अशी मिश्कील भावना व्यक्त केली. त्यामुळे व्यासपीठावर आणि सभागृहात एकच हास्यकल्लोळ झाला.
गोपीचंद पडळकर हा मंगळसूत्र चोरनारा नाही तर मंगळसूत्राचं रक्षण करणारा आहे. कारण योद्धा रणांगणात हरत नसेल तर त्याला बदनाम करण्याचा प्रयत्न केला जातो. आम्ही ज्यांना नेता म्हणलं ते आमचे देवाभाऊ गोपीचंद पडळकर यांना एक दिवस मंत्री केल्याशिवाय थांबणार नाहीत. तो पर्यंत कोणीही कितीही देव पाण्यात घालू द्या काही उपयोग होणार नाही. मी सुद्धा लोकसभेला निवडणुकीत उभा राहणार आहे. पण आम्हाला नेहमी एक भीती वाटते. ती म्हणजे अडनावाची, असं ही खोत म्हणाले.