Advertisement
छगन भुजबळ यांनी दिलं उत्तर
जळगाव : शरद पवार आणि अजित पवार एकत्र येणार का? अशी जोरदार चर्चा रंगली आहे. राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांना मीडियाने याबाबत विचारले असता भुजबळ यांनी थेट प्रतिक्रिया दिली. जळगावात चांगले ज्योतिषी आहेत. त्यांनाच या संदर्भात विचारतो, असं उत्तर छगन भुजबळ यांनी दिलं आहे.
छगन भुजबळ हे मीडियाशी संवाद साधत होते. यावेळी त्यांना अजितदादा आणि शरद पवार एकत्र येण्याबाबतचा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी ही प्रतिक्रिया दिली. हे दोन्ही नेते एकत्र येतील की नाही मला माहीत नाही, असं छगन भुजबळ यांनी स्पष्ट केलं. आमचा पक्ष एक नंबर होत असेल ततर निश्चितच चांगलं आहे. भाजपचे आमदार सव्वाशे पेक्षा जास्त झाले आहेत. ते अधिक वाढतच आहेत. त्यामुळे आपल्याला कुठून कुठे जायचे याचा विचार करूनच काम केलं पाहिजे, असंही ते म्हणाले.
अजितदादा आणि जयंत पाटील यांच्या बंददाराआडील चर्चेवरही त्यांनी प्रतिक्रिया दिली. जयंत पाटील आणि माझीही अनेकदा चर्चा होते. विधानसभेत ते माझ्या बाजूलाच बसतात. आम्ही चर्चा कतो. आव्हाडही माझ्या बाजूलाच असतात. आम्ही अनेक विषयांवर चर्चा करतो. अजितदादा आणि जयंत पाटील यांनी चर्चा केली तर काय बिघडले? आम्ही शत्रू नाहीत आम्हाला धडा मिळालेला आहे. ते आमच्या विरोधी पक्षात आहेत. त्यांची मते वेगळी आहेत, आमची वेगळी आहे, असं भुजबळ यांनी सांगितलं.
ओबीसी नेत्यांना डावललं जात आहे का? असा सवाल भुजबळ यांना करण्यात आला. त्यावरही त्यांनी भाष्य केलं. जे मोठे नेते असतात, त्यांना आजच नाहीतर अगोदरपासून अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. सामाजिक, राजकीय काम करणाऱ्या नेत्यांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते. हे माझ्यासाठी नवीन नाही. मंत्री म्हणून तुम्हाला डावललं गेलं, मात्र याच्याशी त्याचा काही संबंध नाही. तो विषय सोडा, असंही राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ म्हणाले.