Advertisement
मुंबई : 2019 मध्ये झालेल्या निवडणुकीत आम्ही निवडून आल्यानंतर 21 दिवस आम्हाला मुंबईमध्ये फिरवलं होतं. शिंदे साहेबांकडे बोट दाखवून उद्धव साहेबांनी सांगितलं होतं की आम्हाला सामान्य शिवसैनिकाला मुख्यमंत्री बनवायचं आहे. एका रात्रीमध्ये असं काय घडलं? संजय राऊत आता बोलत आहेत की पवारसाहेबांचा विरोध होता. हेच ते पाच वर्षांपूर्वी का बोलले नाहीत? अजून सुद्धा पवार साहेबांच्या मांडीला मांडी लावून बसतात. माझं आव्हान आहे शरद पवारांच्या प्रवक्त्यांनी सांगावं आमचा एकनाथ शिंदे यांच्या नावाला विरोध होता. राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांनी आम्हाला खासगीत सांगितले होते की हा अधिकार फक्त उद्धव ठाकरे यांचा आहे, यामध्ये आम्ही हस्तक्षेप करणार नाही, असं म्हणत शिवसेना नेते आणि मंत्री शंभुराज देसाई यांनी शिवसेना ठाकरे गटावर जोरदार हल्लाबोल केला आहे. यावेळी देसाई यांनी म्हटलं आहे की, विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेना ठाकरे गटाला गळती लागली आहे,अजूनही शिवसेना ठाकरे गटातील अनेक नेते नाराज आहे. उद्धव ठाकरे कधीही भेटीगाठी घेत नाहीत, ते थेट मुंबईला बोलवतात. आमचा जर एखादा सदस्य रुसला तर आम्ही घरी जाऊन बसतो. यांचे आमदार खासदार निघाले तर यांचे पॅचअप कुठे तर मुंबईला बोलावून? नाराज पदाधिकाऱ्यांची समजूत त्यांच्या दारात जाऊन करायची असते त्याला आपल्या दरबारात बोलावून समजूत निघत नसते. त्यांनी जागेवर बसून कितीही हातपाय झटकले तरी त्याचा काहीही उपयोग होणार नाही, असा टोला देसाई यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला आहे.